पक्षिमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू
पक्षिमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू

चंद्रपूर – पक्षी असो की प्राणी हे अन्नसाखळीतील घटक आहेत. ते तुटले तर जगणं कठीण होईल. त्यामुळे जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा, भविष्याचा वेध घेण्यासाठी या संमेलनातून निघणाऱ्या निष्कर्यातून सरकार काम करेल, पक्षिमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो संस्था आयोजित व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे आयोजित ३५ व्या पक्षिमित्र संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार, संमेलनाध्यक्ष राजकमल जोब, वन प्रबोधिनीचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपविभागीय अधिकारी मुरुगनंथम, महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शाह, ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष सुरेश चोपणे, इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे उपस्थित होते.

हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया

वन, सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार म्हणाले, गेल्या काही काळात पर्यावरण समतोल बिघडल्याने पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. पर्यावरण आरोग्य ठीक नसेल तर पक्षी जगणार नाही. त्यासाठी चिंतन करून संवर्धनाची गरज आहे. त्यासाठी शासनाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्याचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. सारस पक्ष्यासाठी ६२ कोटीची योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ताडोबा- अंधारी प्रकल्पात पक्ष्यांचे चित्र प्रदर्शन भरविण्यात यावे, त्याची माहिती क्यू आर कोड पद्धतीने देण्यात यावी, महाराष्ट्रव्यापी छायाचित्र पुरस्कार योजना घेण्याची सूचना मुनगंटीवार यांनी दिली.

संमेलन अध्यक्ष राजकमल जोब म्हणाले, बहुतेक पक्षिमित्रांचे पक्षी निरीक्षण जलाशयांवरील पाणपक्षी गणने पासून सुरु झालेले आहे. हिवाळ्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या जलाशयांवर येणाऱ्या स्थलांतरित पाणपक्ष्यांची गणना हा उपक्रम आजदेखील महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने कडे नवीन पक्षी निरीक्षकांना आकृष्ट करु शकतो. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने या उपक्रमाला अधिक चालना देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा: माळढोक वाचविण्यासाठी BREEDING CENTER

यावेळी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे प्रा. डॉ. जयंत वडतकर यांनी भूमिका मांडली. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शाह यांनी नवे संमेलन अध्यक्ष राजकमल जोब यांना महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनांचे ध्वज हस्तांतरित केले. मान्यवरांच्या हस्ते ३५ व्या पक्षिमित्र संमेलनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.

महाराष्ट्र पक्षिमित्र आणि होप संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पक्षिमित्र पुरस्कार २०२२ चे यावेळी वितरण करण्यात आले. यात जीवनगौरव पुरस्कार भीमा शंकर कुलकर्णी, पक्षीमित्र व संशोधन पुरस्कार प्रा. डॉ. जयवर्धन बालखंडे, शुश्रूषा पुरस्कार राजकुमार कोळी, पक्षी जनजागृती पुरस्कार अनंत पाटील, उदयमुख पक्षीमित्र पुरस्कार कुमारी अमृता आघाव आणि कुमारी यशश्री उपरीकर यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा नंदराज यांनी केले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment