समृद्धी महामार्गावरील ७२७ कोटींची हरित संपत्ती वन विभागाकडे Samruddhi Mahamarg: Social Forestry and MSRDC MOU
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सुमारे ७२७ कोटी रुपयांच्या हरितीकरण प्रकल्पाची जबाबदारी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील सर्वात मोठ्या महामार्ग हरितीकरण प्रकल्पाच्या संवर्धनासाठी वन विभागाची भूमिका अधिक बळकट होणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी सुनिल शिंदे यांनी दिली आहे.
नागपूर ते ठाणे दरम्यानच्या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गालगत ४,५०० हेक्टर क्षेत्रात ३० लाखांहून अधिक वृक्ष व वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये ११.३२ लाख वृक्ष, १२.५४ लाख झुडपे, ३.८० लाख वेली, सुमारे ३ लाख बांबू आणि २.९६ लाख अगेव वनस्पतींचा समावेश आहे.
या हरित संपत्तीच्या संवर्धनासाठी अत्याधुनिक सिंचन व्यवस्था उभारण्यात आली असून, त्यामध्ये ७० विहिरी, १२ जलस्त्रोत, ९ जलसाठे, ८१ पंपगृहे, २ हजार २८७ किलोमीटर जलवाहिन्या अणि १० हजार २५६ किलोमीटर ठिबक सिंचन जाळे विकसित करण्यात आले आहे. वृक्षलागवड, देखभाल, संवर्धन आणि सिंचन व्यवस्थापनाची जबाबदारी वन विभागाकडे राहणार आहे. यासाठी आवश्यक निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या हस्तांतरणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, समृद्धी महामार्गावरील हरित पट्टा पर्यावरण संरक्षण, कार्बन शोषण, जैवविविधता संवर्धन तसेच प्रदूषण नियंत्रणात महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचेही विभागीय वन अधिकारी सुनिल शिंदे यांनी कळविले आहे.
Image Courtesy: Maha Forest Official (@MahaForest) / X
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.