पावसाळ्यातील साहसी पर्यटनातील धोके Adventure Tourism in Monsoon
पाऊस सुरु झाला कि सह्याद्रीतील डोंगररांगा हिरवाईने नाटतात. ओढे, नाले, धबधबे ओसंडून वाहू लागतात आणि यामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखी उठून दिसते. हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे गर्दीने तुडुंब भरून जातात. Adventure Tourism in Monsoon.
परंतु पावसाळी भटकंती करत असताना ती अत्यंत काळजीपूर्वक करणेही तितकेच आवश्यक आहे. सह्याद्रीतील वाटा पाऊसामुळे निसरड्या होतात, दाट धुके आणि वाढलेल्या गवतामुळे वाट हरवते, घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्यामुळे ओढे, नाले, धबधबे यांना मोठ्या प्रमाणात पाणी असते, कधी ढगफुटी सदृश पाऊस होऊन त्या परिसरातील ओढ्याना नद्यांना पूर येतो, गड किल्ल्यांवरील तटबंदीचे दगड निसटून दरड कोसळण्याचा धोका असतो या अशा अनेक धोक्यांपासून सावध राहून भटकंती करणे गरजेचे आहे.
सह्याद्रीमध्ये साहस नक्की करावे पण आतिसहस करून धोका पत्करू नये. मुख्य म्हणजे पावसाळा किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये एकट्याने भटकंती कधीही करू नये. गिर्यारोहकांचे अनेक संघ आजवर सह्याद्रीमध्ये निस्वार्थपणे मदतकार्य करत आहेत. परंतु हे मदतकार्य करताना आतिसाहसामुळे दुखावलेल्या किंवा मृत पावलेल्या व्यक्तिंना बाहेर काढताना अत्यंत दुःख होते. गार्डीयन गिरिप्रेमी इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियरिंग आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संचालित महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डीनेशन सेंटर मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो गिर्यारोहक हे मदतकार्य एक सामाजिक बांधिलकी म्हणून करतात आणि हे मदतकार्य करत असताना कित्येकदा या स्वयंसेवकांना स्वतःचा जीव धोक्यात घालूनही कार्य करावे लागते. त्यामुळे निसर्गाचे हे अत्यंत विलोभनीय दृश्य सर्वानी जरूर अनुभवावे, परंतु स्वतःची आणि निसर्गाची काळजी घेऊनच

पावसाळी पर्यटन करताना काय काळजी घ्यावी व बाहेर पडताना काय गोष्टी पाहून बाहेर पडावे आणि काय तयारी असावी याकरिता अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या महाराष्ट्रातील सर्वोच्च गिर्यारोहण संघटनेने नियमावली जाहीर केली आहे. तरी सर्व पर्यटकांनी पर्यटनासाठी जाताना या सर्व बाबींचा आवर्जून पालन करावे.
पावसाळ्यात सह्याद्रीमध्ये भटकंती करताना मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत. अनेक वेळा लोक गडकिल्ल्यांवरच्या धोकादायक तटबंदी, बुरुज, कड्यांवर जाऊन सेल्फी घेत आहेत. धबधब्यांखाली भिजण्यासाठी जात आहेत. माहित नसलेल्या दुर्गम ठिकाणी भटकंतीसाठी जात आहेत. यामध्ये अनेकजण दुर्घटना ग्रस्त होताना दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये सह्याद्रीचे मनमोहक रूप नक्की पहिले पाहिजे पण ते करताना धबधबा पाहण्याचा आनंद लांबून घेणे अधिक सुरक्षित असेल. सह्याद्रीतील निसरड्या वाटा, ढासळणाऱ्या दरडी, धुके, धबधबे ओढ्यांचे तीव्र प्रवाह टाळले पाहिजेत. अतिसहसी कींवा अतिरेक न करता आणि सुरक्षित ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन भटकंती केल्यास त्याचा जास्त आनंद घेता येईल. सुरक्षित साहसी पर्यटन करण्यासाठी सर्वानी वरील गोष्टींची योग्य काळजी घ्यावी आणि यासाठी महासंघाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे करण्यात आले आहे

पावसाळी पर्यटनासाठी मार्गदर्शक सूचना
- ओळखीच्या व अनुभवी ग्रुप सोबत ट्रेकला जावे
- ट्रेक मधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी
- ग्रुप कडे First Aid चे साहित्य असावे.
- ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर/ग्रुप यांची माहिती घरी/जवळच्या व्यक्तीस द्यावी.
- ट्रेक मध्ये First man व Last man यांच्या मध्येच चालावे
- ट्रेक एक दिवसाचा असला तरी सोबत चांगली टॉर्च ठेवावी
- आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा.
- पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे
- पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी
- किल्ल्यांवरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेष यांवर चढू नये, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो
- Walking stick सोबत ठेवावी, त्यामुळे मुळे चढणे, उतरणे व चालणे सोपं होतं
- शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे
- आपतकालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईल जपून वापरावा
- अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे
- शहरी गोंगाट या ठिकाणी करू नये
- किल्ल्यावर, जंगलात, धबधब्यांजवळ कचरा करू नका. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवा
- पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास समजून येत नाही. अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती असते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये.
- धबधब्याच्या प्रपात सोबत वरून दगड पडण्याची शक्यता असते.
- डोहात, धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.
- गर्दीची ठिकाणे टाळावी.
- आयत्यावेळी ट्रेकमध्ये बदल केला तर त्याबद्दल संबंधितांना कळवा
- ट्रेक संपल्यावर सगळे घरी पोहचले आहेत याची खात्री करा.
- सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावे. आपत्कालीन स्तिथीत त्याचा उपयोग होतो.
- सोबत असणारे सर्व साहित्य प्लास्टिक बॅगमध्ये टाकून चांगले पॅक करून सॅक मधे टाकावे. ते ओले होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास ७६२० २३० २३१ या २४x७ हेल्पलाईन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा.
Image courtesy: Copilot, Grok AI
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.