सांबराच्या शिंगाना मागणी मोठी पण विक्री नाही Sambar Deer Antlers
ऐतिहासिक घटनांबद्दल अलीकडे नागरिकांमध्ये कुतुहूल वाढलं आहे. अनेक हौशी लोक त्यांची गावाकडची घरं, फार्म हाऊस जुन्या वाड्यांप्रमाणं बांधत आहेत. पूर्वीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तू वापरण्याचाही नवीन ट्रेंड आला आहे. अनेक जण दिवाणाखान्यातील डेकोरेशन सुध्दा जुन्या पद्धतीने करत आहेत. त्यामुळे या हौशी लोकांना आता जुन्या वाड्याच्या दिवाणखान्यात भिंतीवर सांबराची शिंग Sambar Deer Antlers टांगलेली असायची तशी नवीन रचनेतही अडकावयाची आहेत. या हौशी लोकांमुळे तसेच सांबराच्या शिंगाच्या औषधी उपयोगांमुळे गेल्या काही वर्षात या शिंगाची मागणी खूप वाढली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे सांबरांचे वास्तव्य आहे, तिथे दर काही महिन्यांनी सांबर शिंगाची तस्करी करणाऱ्यांना पोलिस किंवा वन विभागाचे अधिकारी पकडतात. बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे सांबराच्या शिंगांना खूप मागणी वाढली आहे. पण वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सांबरांना संरक्षण असल्यामुळे सांबराची शिंगे विकण्यास आणि खरेदी करण्यास कायद्याने परवानगी नाही. सांबराची शिंगे गळून पडत असली तरी ती उचलूनही त्याची विक्री करता येत नाही. अनेकांना कायदा माहिती नसल्याने हौसेने लोक शिंग खरेदी करतात आणि नंतर कायदेशीर प्रक्रियेत अडकतात. महत्त्वाची बाब म्हणजे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना जरी जंगलात गस्त घालताना सांबराची शिंग पडलेली सापडली तरी ते लिलाव करू शकत नाही.
हेही वाचा: पावसाळ्यातील साहसी पर्यटनातील धोके आणि घ्यावयाची काळजी

काही दिवसांपूर्वी पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये तेथील सांबर, चितळ आणि इतर हरणांची नैसर्गिकरित्या गळून पडलेली तब्बल १७६ मोठी शिंग तेथील कर्मचाऱ्यांनी गोळा करून ठेवली होती. पण नियामानुसार या शिंगाची खरेदी विक्री होत नसल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून प्राणिसंग्रहालयाच्या पथकाने ती नियमानुसार विद्युत दाहिनीमध्ये नष्ट केली. वन्यप्राण्यांचे अवेशष आणि तस्करी हा संवेदनशील विषय असल्यामुळे शिंगांचे संकलन ते पूर्ण नष्ट केल्याचा पंचनामा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. सगळ्यांसाठी ही प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली. एरवी देखील वन विभाग किंवा पोलिसांनी सांबराच्या शिंगाची तस्करी कऱणाऱ्या आरोपींना पकडले की ताब्यात घेतलेली शिंग पंचनामा करून जाळली जातात. सर्वसामान्यांना वन्यजीव संवर्धन कायदा माहिती नसल्याने त्यांच्याकडून अनेकदा शिंगाची खरेदी विक्री केली जाते. ज्यांच्या घरांमध्ये पुर्वजांकडून आलेली हरणाची शिंगे किंवा वाघाची कातडी ठेवलेली आहे; त्यांना त्यांच्या गावातील, जिल्ह्यातील किंवा शहरातील वन विभागाच्या कार्यालयात जाऊन त्याचा परवानाही घेऊ ठेवावा लागतो.

तुम्हाला माहिती आहे का
- सांबराची शिंगे हाडांपासून बनलेली असून भरीव व जाड असतात.
- पूर्ण वाढ झालेली शिंगे उन्हाळ्याच्या आधी गळून पडतात.
- ती गळून पडण्यासाठी नर त्यांची शिंगे झाडाला घासतात.
- शिंगे २-३ आठवड्यांत गळून जातात. शिंगे गळून पडल्यावर नर सुरक्षिततेसाठी लपून वावरतात.
- उन्हाळा संपतासंपता पुन्हा नवीन शिंगे फुटायला सुरुवात होते.
- सुरुवातीला शिंगांवर मखमली आवरण असते. शिंगांची वाढ पूर्ण झाली की ते आवरण निघते
- शिंगांना सुरुवातीला दोन सारख्या लांबीच्या शाखा असतात. पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांपैकी एका शाखेला दोन शाखा फुटतात. म्हणून सांबरांच्या शिंगाना तीन टोके दिसून येतात.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.